Thursday, 18 June 2009

सुटलो चला !

व्वा !! आज कधी नव्हे ते दहावीच्या रिझल्ट ची तारीख जाहीर केली. ( २५ जून आहे बरं का ).या वाक्यात दडलेला 'व्वा' चा सुप्त अर्थ दहावी दिलेल्यांनाच माहीत. कुठेही, कोणतहि माणूस भेटला की त्याच्या तोंडी एकच प्रश्न असायचा "काय मग रिझल्ट कधी आहे ?" याशिवाय दोन प्रश्न म्हणजे "किती पडतील ?" (मार्क हो! ) आणि "पुढे काय करणार ?"
एकदा असाच रस्त्यात एक ओळखीचा मनुष्य भेटला . आता दहावी दिलेल्या मुलाला प्रश्न विचारल्याशिवाय तर सोडत नाहीच कुणी. त्याने विचारलं,
"काय करणार मग पुढे ?"
"आता घरी जाणार, जेवणार, अणि झोपणार"
"तसं नव्हे रे , दहावीनंतर पुढे काय करणार ?"
"कॉलेज !!"

चला आता रिझल्ट ची तारीख जाहीर झाल्याने एक प्रश्न कमी झाला. २५ जून रोजी "किती टक्के पडतील ?" हा पश्न कमी होईल . आणि admission झाल्यावर मग 'पुढे काय करणार' हा प्रश्नही थांबेल .

Saturday, 30 May 2009

मूर्तिमंत भीती उभी !


बिल गेट्स म्हणे पक्ष्यांना फार भितो. मला तर हे खरं वाटत नव्हतं. म्हणून मी त्याचा छडा लावायचा ठरवला. आणि ते खरं निघलं की हो ! त्याचं झालं काय की,

बिल गेट्स मध्यंतरी महाराष्ट्र दौ-यावर आला होता. त्याला इथल्या शाळांतील संगणक शिक्षणात काय काय प्रगती झाली आहे हे पाहायच होतं. आपल्याकडील टूर गाइडही फार बुद्धिमान. आता त्या बिल गेट्स ला कंप्यूटर लॅब्स दाखवून मोकळं करायच सोडून त्याला शाळेतलं स्नेहसांमेलन पाहण्याचा आग्रह केला. बिल तयार झाला.
आणि तिकडे त्या शाळेत ती लहान मुलं "किल बिल किल बिल पक्षी बोलती" या गाण्यावर नृत्य करत होती. इकडचे पक्षी बिल ला 'किल' करायची सूचना देतात हे पाहून बिल गेट्स पक्का घाबरला. तेव्हापासून त्याच्या मनात पक्ष्यांबद्दल फार भीती आहे !

Wednesday, 11 February 2009

पत्र

प्रिय उत्साही वाचक,

मागच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आणि या पोस्ट मध्ये बर्‍याच काळाचं अंतर आहे.
त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमची दहावी. खरं तर २६ नोवेंबर च्या हल्ल्यानंतर ब्लॉगवर हास्यात्मक काही लिहायचा मूड नव्हता. त्यानंतर भारतात विविध नेत्यांचा जो लाइव्ह कॉमेडी शो सुरू होता त्याला तोड नव्हती. आणि अभ्यास हे तर ब्लॉग न लिहीण्याचं महत्वाचं कारण आहे.
अभ्यासाचा विचार करताना एक विचार सुचला.


अभ्यासाची परिसीमा काय ?
बोर्डाच्या परीक्षेला रजा घेऊन घरी अभ्यास करत बसणे !!!

( हा विनोद होता त्यामुळे गरजूंनी हसावे. परीक्षेच्या करणाने पुढील विनोद २० मार्च
नंतर नोंदवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)

हसावे--नव्हे--कळावे,
(२० मार्च नंतर) आपलाच,
क्षितिज मदन देसाई

Saturday, 22 November 2008

पर्यटन

वा ! आता कुठे ब्लॉग लिहायला वेळ मिळाला. मी जरा बिझी होतो. आमच्या कडे एक चिनी पाहुणा आलेला. थोड्या गप्पा(मोडक्या इंग्रजीतून) झाल्यावर तो म्हणाला की त्याला भारतातली प्रसिद्ध ठिकाणं पाहायची आहेत. मी त्याला पहिले ' इंडिया गेट' दाखवलं. त्याला ते आवडलं.
म्हणाला, "हे बनवायला किती दिवस लागले असतील ?"
मी उत्तर दिलं-,"अरे दिवस नाही, काही वर्ष लागली असतील."
"वर्ष ? आमच्याकडे तर दोन-तीन आठवड्यात असा दरवाजा बनवतील"
चीन मधली भिंत अठवून मी त्याला काही बोललो नाही. पण दुसर्‍या दिवशी त्याला डायरेक्ट ताज महाल दाखवायला नेलं. तेव्हा पण तोच प्रश्न-
"हे बनवायला किती महिने लागले ?"
आमचं इतिहासाचं जुनं पुस्तक आठवून (आणि त्यातली काही वर्ष गाळून) मी म्हणालो,
"काही तरी दहा-पंधरा वर्ष लागली"
"दहा वर्ष ? आमच्याकडे तर हे दहा महिन्यात बनवतील"
माझं देशप्रेम उफाळून आलं. मी त्याला पुढच्या दिवशी कुतुब मिनारला घेऊन गेलो. तो त्याला खूप आवडलेला दिसत होता.
"हे मात्र चांगलं बनवलय. तू मला ते इंडिया गेट नि ताज महाल वगैरे दाखवण्यापेक्षा हा कुतुब मिनार आधीच का नाही दाखवलास ?"
"कसा दाखवणार ? कालपर्यंत हा बनलेला थोडीच !!!"


(काल्पनिक)