Sunday, 6 April 2014

आहारतज्ञ ऋजुता दिवेकर निवडणूक प्रचारात ? - खोडसाळ टाईम्स

खो.टा. प्रतिनिधी, मुंबई
निवडणूक प्रचारात सिनेकलावंतांना पाहण्याची सवय मतदारांना झालेली आहे. मात्र काही पक्ष प्रचारासाठी हटके आयडिया लढवत आहेत.
'तेलकट वडे - चिकन सूप' च्या आरोपांनी व्यथित झालेल्या सेना नेतृत्वाने या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी डाएट एक्स्पर्ट ऋजुता दिवेकर यांना पाचारण केल्याची चर्चा आहे. 'आम्ही फुकाचे आरोप करत नाही. म्हणून या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीला आमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे' असा दावा कार्यकर्त्यांनी खासगीत केला.
मात्र सेनेवर मात करण्यासाठी कॉंग्रेसने देखील ऋजुता दिवेकर यांना प्रचारार्थ बोलावले असल्याचे समजते. 'विरोधी पक्ष आज अन्नाचा मुद्दा काढत असले तरी मुळात अन्नसुरक्षा कायदा आम्ही आणला.' असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्यांनी केले. अन्नसुरक्षा कायदा व महिला सबलीकरण हे मुद्दे कॉंग्रेससाठी निवडणुकीत महत्वाचे आहेत. ऋजुता दिवेकर आहारतज्ञ आहेत, तसेच त्या स्वत: स्वतंत्र सक्षम महिला आहेत त्यामुळे कॉंग्रेससाठी त्यांचा चेहरा योग्य ठरेल, असा विश्वास कॉंग्रेस धुरिणींना वाटत आहे.
त्याच दरम्यान 'आप'नेही त्यांनाच प्रचारात बोलावण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे वृत्त आहे. 'उन्हाळा हा आंब्यांचा सीझन. चांगल्या आरोग्यासाठी सीझननुसार फळे खावीत, असे ऋजुता दिवेकर म्हणतात. आमच्या पक्षाच्या नावातच 'आम' आसल्याने त्यांनी आमच्या पक्षाच्या प्रचाराला यावे अशी विनंती आम्ही करणार आहोत.' असे एका आम आदमीने सांगितले.
या संबंधात खो.टा. प्रतिनीधींनी वारंवार प्रयत्न करूनही दिवेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Saturday, 5 April 2014

मी पाठ आहे

शीर्षक बघून गोंधळण्याचं काही कारण नाही. 'I am back' चं संदर्भहीन भाषांतर आहे हे. सध्या बरीच संदर्भहीन राजकीय भाषणे आणि टीका-टिपण्णी ऐकावी लागत असल्यामुळे तसंच भाषांतर केलं.
तर सांगायचा मुद्दा हा, की मी ब्लॉगवर परतलोय ! साधारण दोन वर्षांनी. तसंही लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारांची आठवण पाच वर्षांनी होते, त्या तुलनेत मला फार लवकर आठवण आली ब्लॉगची :D
तसं आठवण यायचीच सारखी, पण आज लिहू - नंतर लिहू म्हणून राहून जायचं.
एखाद्या 'ट्रिगर' ची गरज होती ;)  आणि मागच्याच महिन्यात 'ट्रिगर' ओढला गेला.
आमच्या शहरातल्या थेटरात 'फॅंड्री' पाहायला गेलो होतो. रात्रीचा खेळ. शो संपल्यावर जिना उतरून बाहेर येताना पाठीवर थाप पडली. वळून पाहिलं तर, 'वटवट सत्यवान' ब्लॉगच्या वॉलपेपर वरचा चेहरा समोर ! समोर खरोखरीच हेरंब दादा उभा होता. सातासमुद्रा पलिकडून थेट 'टिळक' टॉकिजात.
(दादा देखील डोंबिवलीत पाठ आहे.)
त्याचाशी बोलताना जाणवलं की कित्ती दिवस झाले ब्लॉगवर काही लिहिलंच नाही आपण !
सो फायनली आज, ब्लॉगवर मी पाठ आहे.

Sunday, 14 October 2012

ती येतेच !


कितीही वेळा मनाशी ठरवलं की तिला नकार द्यायचा, या वेळेस तरी 'नाही' म्हणायचं, तरी प्रत्यक्षात तसं म्हणता येत नाही. ती येतेच. येते आणि वाहवत नेते मला तिच्यासोबत.
किती नुकसान करून घेतलं आहे तिच्यामुळे  मी स्वत:चं !
आईला सुद्धा माहीत आहे तिच्या बद्दल सगळं. ती म्हणते , 'तुला अभ्यास आहे एवढा, बाकीची कामं आहेत.. तरी सगळं सोडून पुन्हा तिच्या नादी का लागतोस तू ?'
मला पण पटतं हे. मनाशी ठरवतो, बस झालं ! आता  यापुढे ठामपणे नकार द्यायचा तिला. पण ती येतेच. नेहमी प्रमाणे येते आणि अशी काही जादू करते की नकार विरघळून जातो तिच्यात.
काय आहे, मनाशी कितीही वेळा ठरवलं ना, तरी शरीर प्रत्येक वेळेस होकार देतं. मनाचे बंध झुगारून शरीर तिच्याकडे धाव घेतं. म्हणूनच ती येते.
आजही ती आली होती..
ती म्हणजे 'रविवार दुपारची झोप' :D :D :D
म्हटलेलं रविवार आहे तर सगळ्या असाइनमेंट्स लिहून काढूया, पण कसलं काय ! जेवण झाल्यावर जी ताणून दिली दुपारी, की पाच वाजता उठलो.
त्यातल्या त्यात एक बरं झालं, 'तिच्या' निमित्ताने ब्लॉग वरची धूळ झटकून नवीन पोस्ट तर आली :)

Friday, 1 June 2012

'देशव्यापी' भारत बंद

नाही, शीर्षक चुकून दिलेलं नाही. हे खरं आहे. एका पक्षाच्या बोर्डावर 'देशव्यापी भारत बंद' असं लिहिलेलं पाहिलं. म्हणजे इतर वेळचा भारत बंद कसा असतो ? हे म्हणजे 'अख्खा मुंबई में वर्ल्डफेमस' सारखं झालं. पण बरीच लोकं बोलताना असे भलते शब्द प्रयोग वापरत असतात. एक प्रसिद्ध शब्द प्रयोग म्हणजे 'बॅडलक खराब आहे यार !'
"एका सेकंदासाठी गाडी गेली रे ! माझं बॅडलकच खराब आहे" असं एक मित्र म्हणत होता. आता 'बॅडलक' खराब असेल तर त्याचं लक चांगलं आहे असाच अर्थ झाला ना ?
तसं लहान मुलांच्या लेखी वाढदिवस कायम हॅपी असतो.
"अरे वा ! चॉकलेट कशाबद्दल ?"
"आज माझा हॅपी बड्डे आहे ना, म्हणून" असं ते सहज म्हणून जातात.
बरोबर आहे, मोठी माणसं वाढदिवस वेन्जॉय करायचं सोडून नसत्या विचारात गुंतलेली असतात. (आपली शिरिन बघा, वाढदिवसाला म्हणते "आपण एक वर्ष मोठे झालो याचा आनंद साजरा करायचा की आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं म्हणून दु:ख करायचं ?"  )
वाढदिवसावरनंच आठवलं, भारत बंद वाल्या एका बोर्डावर लिहिलं होतं 'पेट्रोल वाढीच्या निषेधार्थ भारत बंद !'
पेट्रोल वाढलं तर वाढू द्या की, फक्त त्याचे दर कमी करा ! तसंही, पेट्रोल वाढलं तर दर कमी होतील का ? सप्लाय अँड डिमांड असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तज्ञानी कृपया मार्गदर्शन करावे :)